Tuesday, September 15, 2015

Grace kavita part 3

ग्रेसच्या कवितेत निसर्ग- श्रीनिवास हवालदार आणि भालचंद्र लिमये
१.भूल
प्रकाश गळतो हळू हळू कि; चंद्र जसा उगवे
पाण्यावरती उमटत जाती अंधुक अंधुक दिवे
दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका
दु:ख सुरांच्या क्षितिजापाशी मेघ दिसे परका
हिमनगरातील बर्फ धुळीचे उत्सव भरले नवे
धुक्यात तुटल्या शिखरांवरती पक्ष्यांचे हे थवे
मंदीर मंदीर पाणी पाणी शिल्प कुठे वितळे
दु:खाच्या तंद्रीतून जैसे अमृत ठिबकत निळे
माझ्या हातून मूठभर माती अवकाशावर पडे
घराघरांना मरण फुलांची गंधित भूल जडे

2. 'आठवण'....
"या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो .
डोळ्यात कुणाच्या क्षितिजे ..
मी अपुले हात उजळतो .
तू आठवणीतून माझ्या
कधी रंगीत वाट पसरशी,
अंधार व्रताची समई
कधी असते माझ्यापाशी ...
पदराला बांधून स्वप्ने
तू एकट संध्यासमयी
तुकयाचा हातांमधला
मी अभंग उचलून घेई ...
तू मला कुशीला घ्यावे
अंधार हळू ढवळावा ..
सन्यस्त सुखाचा कांठी
वळीवाचा पाउस यावा !"

3. निळ्या पाखरांची निळी पाउले
निळ्या पाखरांची निळी पाउले
असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू
निळ्या अस्तकालीन नारायणा
निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेउन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले

4 शब्दांनी हरवुन जावे
शब्दांनी हरवुन जावे
क्षितिजांची मिटता ओळ
मी सांजफुलांची वेळ
वृक्षांच्या कलत्या छाया
पाण्यावर चंद्रखुणांची
मी निळीसावळी वेल
गात्रांचे शिल्प निराळे
स्पर्शाचा तुटला गजरा
मी गतजन्मीची भूल
तू बावरलेला वारा
पायांत धुळीचे लोळ
मी भातुकलीचा खेळ.

5. मंदिरे सुनी सुनी
मंदिरे सुनी सुनी
मंदिरे सुनी सुनी
कुठे न दीप काजवा
मेघवाहि श्रावणात
ये सुगंधी गारवा
रात्र सुर पेरुनी
अशी हळू हळू भरे
समोरच्या धुक्यातली
उठून चालली घरे
गळ्यात शब्द गोठले
अशांतता दिसे घनी
दु:ख बांधुनी असे
क्षितीज झाकिले कुणी?
एकदाच व्याकुळा
प्रतिध्वनित हाक दे
देह कोसळून हा
नदीत मुक्त वाहु दे..

6.तुला पाहिले मी नदीच्या किनारी-
‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे !
तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली
मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते ?
जसे संचिताचे ऋतु कोवळे
अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा

7.कंठात दिशांचे हार
कंठात दिशांचे हार निळा अभिसार वेळूच्या रानी
झाडीत दडे देऊळ गडे येतसे जिथून मुलतानी.
लागली दरीला ओढ कुणाची गाढ पाखरे जाती
आभाळ चिंब चोचीत बिंब पाउस जसा तुजभवती.
गाईंचे दुडुदुडु पाय डोंगरी जाय पुन्हा हा माळ
डोळ्यांत सांज वक्षांत झांज गुंफिते दिव्यांची माळ.
मातीस लागले वेड अंगणी झाड एक चाफ्याचे
वाऱ्यात भरे पदरात शिरे अंधारकृष्ण रंगाचे.
मेघांत अडकले रंग कुणाचा संग मिळविती पेशी ?
चढशील वाट ? रक्तात घाट पलिकडे चंद्र अविनाशी

8. 
ग्रेस यांचा अरण्यातला आणखी एक प्रवास - श्रीनिवास हवालदार 
“अरण्यात एका प्रवासात माझ्या
हिवाळ्यात घोडा जरा वाकला ,
मी पापणीतूनही स्निग्ध तेजांध
डोळ्यांत चंद्रास्तही झाकला.
अता पाहण्याला मुळी अंत नाही
तुझ्या पैंजणी नादनक्षी पुढे;
पारावरी पेटलेल्या चितेतून
ये चांदणी शुभ्र बर्फाकडे ...
भयाने मला भारते अंतवेळा
जशी सांध्यसत्वातली स्वप्नजा;
त्या आत्मजेनेच तोडून नेल्या
तुझ्या सावलीतून माझ्या भुजा...”
- ग्रेस

Monday, September 14, 2015

Grace कविता part 2

देखणा कबीर’ [संध्याकाळच्या कविता]
“दिशावेगळ्या नभांची
गेली तुटून कमान ;
तुझ्या व्रतस्थ दुखाचे
तरी सरे ना ईमान !
जन्म संपले तळाशी
आणि पुसल्या मी खुणा ;
तरी वाटांच्या नशीबी
तुझ्या पायांच्या यातना
भोळ्या प्रतिज्ञा शब्दांच्या
गेली अर्थालाही चीर ;
कांचा वेगळ्या पार्‍यात
तरी देखणा कबीर !!”

असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू
निळ्या अस्तकालीन नारायणा
निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेउन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले

 “तू उदास मी उदास मेघहि उदासले 
स्मृतीतले विदग्ध नाद पैंजणात सांडले !
तुझ्या तनूंत चंद्रशिल्प सांजली निळी जळे 
जसा समुद्र आंधळा नि सूर्य दूर मावळे….”

“भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई"

Grace कविता part 1

उखाणा' [संध्याकाळच्या कविता] 
“शुभ्र अस्थींच्या धुक्यात
खोल दिठीतली वेणा ;
निळ्या आकाश-रेषेत
जळे भगवी वासना.
पुढे मिटला काळोख __
झाली देऊळ पापणी;
आता हळूच टाकीन
मऊ सशाचा उखाणा.”


मंदिरे सुनी सुनी
कुठे न दीप काजवा
मेघवाहि श्रावणात
ये सुगंधी गारवा
रात्र सुर पेरुनी
अशी हळू हळू भरे
समोरच्या धुक्यातली
उठून चालली घरे
गळ्यात शब्द गोठले
अशांतता दिसे घनी
दु:ख बांधुनी असे
क्षितीज झाकिले कुणी?
एकदाच व्याकुळा
प्रतिध्वनित हाक दे
देह कोसळून हा
नदीत मुक्त वाहु दे..

भूपाळी [चंद्रमाधवीचे प्रदेश ]
ती खिन्न भुपाळी 
फिकट धुक्याचा घाट 
वर संथ निळाइत 
नारिंगाची वाट 
ती कातर काळी
तमगर्भाची नगरी
तेजात वितळली ,
स्तंभ उभे जरतारी
अन सावट मंथर
कृष्ण घनांची छाया
ओवीत मिसळली
हंबरणारी माया
हा पिवळा शेला
आज तुझ्या अभिसारा
घे गंध फुलांचा
जशी उन्हाची मधुरा

Sunday, August 30, 2015

पावसा


पाऊस


तुझी आठवण

तू मिठीत येऊन जा, वा आभास दे ना जरा
तुझी आठवण देतच आहे.. तूही त्रास दे ना जरा..
किती सांगायचे आहेत स्वप्नांचे शब्दझुले तुला
पण कारण एक लिहाया पत्रास दे ना जरा..
तू नसताना सुख नको, हे दु:ख लाडके माझे..
परतून ये... अन वेदनांची आरास दे ना जरा..
तो क्षण आठवला प्रेमाचा, अन गीत उमटले नवे
तू साथ तुझ्या स्वरांची.. अर्थास दे ना जरा..
मी प्याल्यातली 'रसिका' तुझी, मी फेसाळलेली कल्पना
तू स्वतःसही माझा कधी.. हव्यास दे ना जरा..
- रसिका
२३/७/२०१५

तू..भाग १

गंधार तुझ्या स्पर्शाचा अलवार स्पर्शूनी जावा
घनगर्द सांजेला जणू राधेला कृष्ण मिळावा..
असा तू..माझा कृष्ण..तुझा प्रत्येक शब्द एक आठवण बनून राहीला आहे....का आलास तू माझ्या आयुष्यात? वार्याच्या थंड झुळूकीप्रमाणे आलास आणी मग एक धुंद वादळ होऊन मला उध्वस्त करून गेलास..नंतर मी आपली शोधतेय..माझ्या मनाचे तुकडे..खरच असच असत का प्रेम? शांत तरी उध्वस्त..संथ तरी इतक वाहवते की की एका क्षणात सगळ आयुष्य जगून जाव आपण..
तू आहेस चंद्रमा म्हणून भरती मला आली..प्रत्येक शब्द तुझा..असा ओघवता..असा अलवार की मनास भिडून जावा..तुझ्या एका शब्दासाठी जग जिंकेंन मी..तू परत भेटशील का? खरा तर माहीत नाहीए मी तुला परत पाहु शकेन की नाही..स्वतमधल सगळ प्रेम, मन, आत्मा, स्वत्व बाहेर काढाव, सूर्याच्या किरणानी ते उजळून निघाव, चांदण्यानी त्यावर मखमली मुलामा द्यावा..आणी प्राजक्ताच्या सुगंधात ते भिजवून माझ्यापुढे सादर कराव, अस काहीस तू समोर आल्यावर वाटत....
तू आरसा आहेस..माझा मनाचा..तुझी प्रत्येक नजर म्हणजे माझ्या हृदयाची स्पंदन आहेत..इतका तू जवळचा...पण..तरीही तू माझ्याकडे पाहिलस की मी लपायला जागा शोधते..तुझ्याच मिठीत..दुसरा कुठे आधार आहे मला? दुसर अस्तित्वच उरला नाहीए माझे..तू ऐकतोयस ना? मी तुझ्या हृदयाच्या एकेक ठोक्यात आहे..तुझ्या प्रत्येक श्वासात आहे..मला दूर करू शकणारच नाहीयस तू..मग हा दुरावा का? ये परत चांदण्यात फिरूया..परत तो क्षण जागवूया..ये..खरच परत ये आज..
प्रत्येक श्वास धावतो तुझ्या सावलीमागे..
आयुष्यभर शोधेन तुला, आज जरासा मिळून जा..
क्रमश:

चांदणचुरा

चांदणचुरा हा शब्द बरेच दिवस मनात घर करून होता..त्यासाठीच केलेला हा प्रयत्न!
दिवस सरतो सोनसळी, रंगांची अवचित दाटी
केशर ओली सांज भेटते कालिंदीच्या काठी
बहरत जाते आसावरी, दरवळती फूलथवे
निळासावळ्या रात्रीला चांदरुपेरी स्पर्श नवे
स्तब्ध शांत पाण्यावरती चंद्रकोर ती हिंदकळे
चांदफुलांनां वेलींना अनंतरांची जोड मिळे
सावळ्या कुंतली धरतीच्या जाईचा पडदा शुभ्र दिसे
प्रेमविरहीणी नवथर कोणी मुखचंद्रमा झाकितसे
चांदणे पिऊन वार्‍याला रातीची मग नशा चढे
स्वप्नांच्या दारी अलगद तेव्हा तृप्तीची चाहूल पडे
उमजत जाते..समजत जाते..रात्र भासते गंधितशी
बासुरीचे होते मन अन सावळ्याची साद जशी
गाभार्यातून जाग येते भूपाच्या पहिल्या स्वरा
धुके पसरते पहाटेवरी उधळून चांदणचुरा!!
- रसिका

Tuesday, January 13, 2015

आठवणीतील कविता

पारवा

भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनी पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो

सूर्य मध्यान्ही उभा राहे
घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेत पेंगतात.

तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडित

चित्त किंवा तव कोवळ्या विखारे
दुखतेखुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान
गोड गावे मग भान हे कुठून

झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.

दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे.


कवी - बालकवी

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या
समुद्रा, डळमलु दे तारे !
विराट वादळ हेलकाउदे पर्वत पाण्याचे 
ढळुदे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले
दडुद्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
करायला पाजुळुदे पलीता !

की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान
मिळाया प्रमत्त थैमान
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती 
करी हे तांडव थैमान

पदच्युता ,तव भिषन नर्तन असेच चालु दे 
फ़ुटुदे नभ माथ्यावरती
आणि , तुटुदे अखंड ऊल्का वर्षावात अग्नी
नाविका ना कुठली भिती

सहकार्यानो, का हि खंत जन्म खलाशाचा 
झूंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे
दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारू लोटले परताया लोटले
असे का आपुला बाणा
त्याहुनी घेऊ जळी समाधि सुखे , कशासाठी 
जपावे पराभुत प्राणा

कोट्यावधी जगतात जिवाणु जगती अन मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली
निर्मीतो नव क्षितिजे पूढती !

मार्ग आमुचा ना रोधु शकतिल ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा 
मानवतेचे निशान मिरवू महासागरात 
जिंकु खंड खंड सारा !

चला उभारा श्रुभ शिडे ति गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला 
? अनंत आमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला ? 

.........कुसुमाग्रज

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

बा. सी. मर्ढेकर

आठवणीतील कविता

पाऊस कधीचा पडतो

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझयाच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा

-कवी ग्रेस

ऐल तटावर पैल तटावर 

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे;

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे

पायवाट पांढरी तयांतुन अडवीतिडवी पडे;

हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे

झांकळुनी जड गोड काळिमा पसरी लाटांवर;

पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर

- बालकवी



पृथ्वीचे प्रेमगीत 

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण 

- कुसुमाग्रज